मंडळाचे ४६ वे वार्षिक स्नेहसंमेलन – एक भावपूर्ण आनंदसोहळा

मंडळाचे ४६ वे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, दि. ४ फेब्रुवारी, २०२५ रोजी मंडळाच्या वास्तूत अत्यंत दिमाखात साजरे झाले. कार्यक्रमाची सुरुवात सभासद कलाकारांच्या ‘रंग लोककलेचे’ या विशेष नृत्याविष्काराने झाली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ४५ कलाकारांनी सादर केलेल्या या विविध लोकरंगांनी उपस्थितांचे मन जिंकलेच, पण प्रमुख पाहुण्यांचीसुद्धा विशेष दाद मिळवली.
.
विद्यार्थी व गुणवंत गौरव सोहळा हा स्नेहसंमेलनाचा मुख्य कार्यक्रमही अत्यंत संस्मरणीय ठरला. मंडळाचे मा. सरचिटणीस श्री. अजयजी खामकर यांचे समयोचित प्रास्ताविक, सौ. करुणा सावंत यांचे सुबोध सूत्रसंचालन, मा.कार्याध्यक्ष श्री. महेशजी चव्हाण यांचे स्पष्ट व अभ्यासपूर्ण विश्लेषण, मा. अध्यक्ष श्री. रमेशजी शिर्के यांचे भावस्पर्शी अध्यक्षीय मनोगत या सर्वांनी कार्यक्रमात भारदस्त वातावरण निर्माण केले. सौ. ऐश्वर्या ब्रीद यांनी सजवलेली प्रवेशद्वारावरील नयनरम्य रांगोळी विशेष लक्षवेधी होती.

.

प्रमुख पाहुणे- सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मा.श्री. विनय शिर्के यांनी केवळ प्रेरणादायी मार्गदर्शनच केले नाही, तर त्यांनी सादर केलेल्या कवितांमधून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची झलकही दिली. कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. रश्मी राणे व निमंत्रक सौ. करुणा सावंत यांनी उत्कृष्ट समन्वय साधून, स्नेहसंमेलनाच्या दोन्ही सत्रांमध्ये असे काही क्षण निर्माण केले, जे मनाच्या कुपीत कायमचे जपून ठेवावेसे वाटतील !